बेंगळूरू : महिंद्रा इलेक्ट्रिकने संपूर्णपणे विजेवर चालणारी ‘ट्रिओ’ नावाची रिक्षा निर्माण केली आहे. देशात या वाहनांचा वापर करण्यास उत्तेजन देण्यासाठी महिंद्रा इलेक्ट्रिक व थ्री व्हील्स युनायटेड (टीडब्लूयू) यांनी सामंजस्य करार केला आहे. पुढील वर्षी देशभरात दोन हजारहून अधिक महिंद्रा ट्रिओ रस्त्यावर उतरविण्याचे उद्दिष्ट आहे. विजेवर चालणारी तिचाकी वाहने आणण्यासह त्यांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असून, याकरता ऑटो चालकांना अर्थसाह्यही देण्यात येणार आहे. ट्रिओच्या प्रकारांमध्ये ट्रिओ इलेक्ट्रिक ऑटो व ट्रिओ यारी इलेक्ट्रिक रिक्षा यांचा समावेश आहे.
‘ऑटो डे २०१८’ चे औचित्य साधून, अनेक वरिष्ठ अधिकारी व मान्यवर यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. या वेळी बेंगळुरू, चित्रदुर्ग व पाँडिचेरी येथील जवळजवळ पाच हजार ऑटोचालक सहभागी झाले होते. थ्री व्हील्स युनायटेड कंपनी (टीडब्लूयू) ऑटोरिक्षा चालकांना परवडणारे अर्थसाह्य देते आणि त्यांचा समावेश सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये करण्याचा प्रयत्न करते.
महिंद्रा इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू म्हणाले, ‘इलेक्ट्रिक मोबिलिटीचे प्रवर्तक म्हणून, महिंद्रा ट्रिओचा अवलंब करण्यास उत्तेजन देण्यासाठी थ्री व्हील्स युनायटेडशी सहयोग करताना अतिशय आनंद होत आहे. भारतातील पहिली लिथिअम-आयन बॅटरी, थ्री-व्हीलर प्लॅटफॉर्म यांचा लाभ घेणाऱ्या ट्रिओमुळे शहरी भागांतील वाहतुकीमध्ये परिवर्तन येईल, असा विश्वास आहे. अशा भागीदारांशी केलेल्या सहयोगांमुळे चालकांना इलेक्ट्रिक मोबिलिटीचा स्वीकार करणे सोपे जाईल, तसेच आपली शहरे पर्यावरणपूरक बनण्यासाठी मदत होईल.’
थ्री व्हील्स युनायटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी सेड्रिक तँदोंग यांनी सांगितले, ‘महिंद्रा इलेक्ट्रिकच्या सहयोगाने भविष्यातील मोबिलिटीच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यासाठी थ्री व्हील्स युनायटेड उत्सुक आहे. आम्ही नेहमीच चालकांना पहिले प्राधान्य दिले आहे आणि चालकांचा कल कमी प्रदूषण करणाऱ्या, पैसे वाचवणाऱ्या, अधिक आरामदायी असणाऱ्या ट्रिओ ऑटोरिक्षाकडे वळवताना हे प्राधान्य कायम राखणार आहोत. आम्ही शाश्वत वाहतुकीला चालना देत असताना, या चालकांना परवडणारी कर्जे उपलब्ध करू आणि त्यांना जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे, यासाठी तंत्रज्ञानाचा अवलंब करू. आम्हाला हे केवळ बेंगळुरूमध्येच नाही, तर संपूर्ण देशात साध्य करायचे आहे. त्यासाठी आगामी तीन वर्षांमध्ये बारा हजार इलेक्ट्रिक वाहने रस्त्यावर धावतील असा प्रयत्न करायचा आहे.’